या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Sunday 21 June 2015

वर्षापंचम

शुष्कपीत  तृणपात्यांवरी
ताडन करीती पर्जन्यमोती
वर्षांजलिने उधळण करीता
मंजूळध्वनी कर्णपूरण करती

रोमांचित काया रेशीमस्वप्नी
शीतस्पर्शी त्या नवपालवीने
गवतमातीचा हा मृदूगालिचा
पदतल सुखवी कलाकारीने

रंगछटा रानी अगणित किती
नेत्रसुखद हा रंगपट विरळा
चित्रकर्त्याची जणू चित्रशाला
भासे सृष्टीचा सृजनसोहळा

रसरसामृत भरुनी रानमेवा
चाखूनी तृप्त तृषार्त रसना
मधुराम्लाची  जिव्हालालसा
संपृक्त ती भावना वर्षासना

मृदगंध वाहतो सर्द सुगंधी
नेत्र मिटती  मद मस्तिष्का
दिव्यानुभूती घेई नासिका
अत्तर शिंपिती तृणपुष्पिका

मौक्तिकमणीच सुस्नात गमे
नीरबिंदू मोहक पर्णकोंदणी
पीककंठी स्वर दिव्य निनादे
विश्वरचयिता रचित रागीणी

.....डॉ. शिवाजी काळे.

Monday 15 June 2015

माणूस आणि नाते......

माणूस आणि नाते.....

       माणूस हा प्रत्येक नात्याशी भावनिक रित्या गुंतलेला असतो.
        भावना म्हणजे मनात उमटलेल्या अनेक गोष्टींचे , विचारांचे तरंग.... जसजसे हे वेगवेगळे तरंग उमटतात, तसतसा हा भावनिक गुंता वाढत जातो. प्रत्येक वेळी त्या तरंगांची तीव्रता कमी जास्त असते.
         कधी कधी त्यात अपेक्षाही डोकावयाला लागतात, मग आपण नात्यांकडे स्वतंत्रपणे पाहू शकत नाही.....
मला तर असे वाटते की, अपेक्षा आणि भावना ह्या जीवलग सख्या प्रत्येक ठिकाणी गोंधळ करतात..... त्या एकत्र असल्या की प्रत्येक वेळी नात्यांना दिले जाणारे महत्व बदलते आणि ह्याच वेळी नात्यांत गैरसमज होणे, नाती दुरावणे हे प्रकार होतात....
          पण प्रत्येक नाते हे वेगळे असते, आपल्या आयुष्यात त्याचे महत्व वेगळे असते आणि काही ऋणाणुबंधाना नात्यांचे नाव देऊ नये..... अशी नाती वेळेनुसार रुप बदलतात, जसे--- मैत्री, प्रेम, गुरू-शिष्य, सहचर, परिक्षक, टीकाकार, तर कधी आई-वडील व मुल....
          बऱ्याच वेळा माणसालाही प्रवाहानुसार वहावे लागते आणि बहुतेक अंशी तेच ईष्ट असते, अशा वेळी ती व्यक्त स्वत:ला फसवत नसते,,, तर स्वतःच्या मनावर सद्सद् विवेक बुद्धीची पकड घट्ट करत असते... आणि असे करुनच नाते जपण्याचा प्रयत्न चालू असतो....
          नात्यांची सरमिसळ न करता,,,,, ते त्या त्या कांगोऱ्यात बसवून जपले पाहिजे आणि प्रत्येक नाते जरी आपापल्या जागी योग्य असले तरी आपले जीवन हे अनेक नात्यांचे मिश्रण आहे..... त्यामूळे सर्वच नात्यांचा एकमेकांवर थोडयाफार प्रमाणात प्रभाव पडतोच...
           आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा, आपुलकी, हट्टीपणा बरोबरच थोडाफार तटस्थपणाही येऊ द्यावा..... प्रत्येक नात्यात बांधीलकी इतकीच मोकळीकही असावी त्यामुळे नात्यांचे बंध अधिक घट्ट होतात,,,, तसेच प्रसंगी माघारही घ्यावी....
       जीवनात आपण स्वतःशीही हळुवार सुसंवाद करावा..... जे स्वतःला उत्तमरित्या जाणतात ते इतरांनाही चांगले समजावून घेऊ शकतात...... परिणामी सर्व नाती,,,, ऋणानुबंध नेहमीच घट्ट गुंफूंन ठेवतात......

----- डॉ माधुरी -----